भारतीय चित्रसृष्टीच्या विकासात महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. दादासाहेब फाळके आणि बाबूराव पेंटर यांनी सुरू केलेले हे कार्य समर्थपणे पुढे नेणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये ‘व्ही शांताराम’ यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून समाजप्रबोधन साधणे हीदेखील आपली नैतिक जबाबदारी आहे’ हा  विचार शांतारामांनी चित्रसृष्टीला दिला. ‘अद्ययावत तंत्रांचा उपयोग’ आणि ‘आपली प्रतीकात्मक दिग्दर्शन शैली’ याने व्ही शांताराम यांनी भारतीय चित्रसृष्टीवर आपला ठसा उमटवला. चित्रसृष्टीतील आपल्या कारकिर्दीत त्यांनी ७० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली, ४४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले, तर २१ चित्रपटांत अभिनय केला.